पंढरी वार्ता :- कौठाळी-शिरढोण पुलाचे सहकार मंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन !
ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी चांगले रस्ते व दळणवळणाच्या सुविधा असणे गरजेचे असते. या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील मौजे कौठाळी-शिरढोण रस्त्यावर बांधण्यात येणा-या पुलाचे भूमिपूजन सहकार मंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, शिरढोणच्या सरपंच उज्ज्वला कांबळे, पंचायत समीतीचे माजी उपसभापती विष्णु बागल, उपकार्यकारी अभियंता एस.टी.राऊत, उप-अभियंता एच.एम.बागल आदी उपस्थित होते.
सहकार मंत्री श्री.देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात चांगले रस्ते असल्यास शेतक-यांचा माल त्वरीत बाजारपेठेत पोहचला जाईल. त्यामुळे त्यांच्या भावाला योग्य भाव मिळेल.कौठाळी-शिरढोण पुलामुळे या परिसराचा विकास होण्यास मदत होईल असेही श्री.देशमुख सांगितले.
आमदार श्री.भालके म्हणाले, कौठाळी-शिरढोण पुलाच्या कामामुळे चार गावातील नागरीकांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बांधण्यात येणा-या पुलाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तसेच मुदतीत पुर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी शाखा अभियंता डी.एम.पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
