पंढरी वार्ता :- मंदीर समितीच्या वतीने दिलेल्या स्वच्छतेचा ठेका रद्द करा,अनछत्रात भाविकांच्या भोजनात चापातीचा समावेश करा !
मंदीर समितीच्या वतीने दिलेला स्वच्छतेचा ठेका रद्द करा,अनछत्रात भाविकांच्या भोजनात चापातीचा समावेश करा !
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीने एप्रिल 2018 पासून बीएसए कार्पोरेशन लि.पुणे या कंपनीस 3 एप्रिल 2018 च्या वर्कऑर्डर नुसार 1 कोटी 93 लाख 6184 इतका मोबदला मोजून मंदीर परिसर,प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा मंदीर परिसराच्या स्वच्छतेचे काम दिले आहे.मात्र प्रत्यक्षात हे स्वच्छतेचे काम या पध्दतीने केल जात नसून केवळ मोजकेच सफाई कामगार नियुक्त करुन हे काम करण्यात येत आहे.या ठेकेदार कंपनीकडून करण्यात येत असलेल्या कामाबाबत नाराजी असून त्यामुळे हा ठेका रद्द करावा व यातून बचत झालेल्या पैशातून संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रातील भोजनात चपातीचा समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या बाबत ठोस निर्णय न झाल्यास मंदीर परिसरातील नागरिक व भाविकांना सोबत घेवून धरणे आंदोलन केले जाईल अशा इशाराही देण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहीती देताना राष्ट्रवादी युवक कॉग्रेेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे म्हणाले की, अद्यावत यंत्रसामुग्री व प्रशिक्षीत मनुष्यबळ वापरुन हे काम केले जाणे अपेक्षीत होते.सदर कामासाठी 102 कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.सिंगल डिस्क स्क्रबर,गारबेज ट्रॉली,विंगर ट्रॉली,ग्लास क्लिनींग किट,टेलिस्कोपीक पोल,सेफ्टी लॅडर अशा अद्यावत यंत्रसामुग्रीचा वापर करुन तसेच विविध केमिकल्सचा वापर करुन हे काम केले जाईल असे कार्यारंभ आदेशात नमुद केले होते.मात्र अशा प्रकारे अद्यावत सामुग्रीचा वापर सुुरुवातीचे काही दिवस करण्यात आला त्यानंतर केवळ सफाई कामगार नियुक्त करुन झाडू मारण्याचेच काम केले जाते.वास्तविक पाहता हे काम पुर्वी नगर पालीकेचे सफाई कर्मचारी व वारकरी साहित्य परिषदेचे कर्मचारी मोफत करीत होते.भाविकांच्या देणगीतून जवळपास दिड कोटी रुक्कम खर्च करुन जर अशाच पध्दतीने हे काम कंपनी करणार असेल तर ही केवळ पैशाची उधळपट्टी आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने तातडीने या ठेकेदार कंपनीच्या कामाची समिक्षा करुन हा ठेका रद्द करावा व यातून वाचलेल्या पैशातून संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रात भाविकांच्या भोजनात चपातीचा समावेश करावा ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
