पंढरी वार्ता : - मराठा आरक्षणासाठी तावशी येथे 'ब्लॅक रिबन ' आंदोलन
मराठा आरक्षणासाठी तावशी येथे 'ब्लॅक रिबन ' आंदोलन
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे रविवार दि.19\08\2018 रोजी स.09 वा.येथील मारूती मन्दिरासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मराठा आरक्षनासाठी ब्लॅक रिबन प्रत्येक मराठ्यांच्या डाव्या दंडाला बांधून आंदोलन करण्यात आले
९ अॉगस्ट २०१६ ला सूरु झालेला मराठा मोर्चाचा प्रवास ९ अॉगस्ट २०१८ पर्यंत मुक मोर्चापासुन ठोक मोर्चापर्यंत कधी येऊन पोहोचला हे लक्षात ही आले नाही. या दोन वर्षात फडणवीस सरकारने हा लढा मोडुन काढण्यासाठी बरेच मार्ग वापरुन पाहिले. पहिल्यांदा इतर समाजाला मराठा मोर्चाच्या विषयी गैरसमज पसरवून प्रती मोर्चे काढायला प्रवृत्त केलं. नंतर आंदोलनात फुट पाडण्यासाठी मोर्चांना जातीय रंग देणे, काही कळसुत्री नेत्यांना आंदोलनात घुसविणे, अशा नेत्यांनी सरकारशी चर्चा केल्याचे वृत्त पसरविणे, समान नागरी कायदा, आर्थिक निकष अशा कधीच अस्तित्वात न येणार्या मुद्यावर आणुन आंदोलकांचे लक्ष भरकटवणे असे अनेक प्रयत्न करुन ही आंदोलनातील एकसंधपणा कमी होत नाही हे लक्षात आल्यावर एक चाल सरकारकडुन खेळली गेली.
मुख्यमंत्री, महसुल मंत्री या सारख्या जबाबदार पदावरील व्यक्तींनी गेल्या १५—२० दिवसात केलेली विधाने पाहता सनदशीर मार्गाने चालणारे मराठा आंदोलन आपला मार्ग सोडुन हिंसक कसे होईल याची काळजी घेणारेच दिसतील. अशा विधानाने ही जेव्हा मराठा आंदोलकांचा संयम सुटला नाही, तेंव्हा मग हुकुमाचा पत्ता काढल्यासारखा ९ अॉगस्टच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात काही समाजकंटकाना घुसवून त्यांच्या करवी जाळपोळ, दगडफेक अशी कृत्ये घडवून आणून मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्याचा डाव टाकला गेला व तो काही अंशी यशस्वी झाल्याचे दिसुन ही आले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी आंदोलन आपल्या आचारसंहितेपासुन, मुळ स्वरुपापासुन भरकटले आहे हा विचार करुन रस्त्यावरील आंदोलने बंद केली.न्याय प्रविष्ठ कारण दाखवत सरकार ही या आंदोलनातील हवा काढुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. बंधु आणी भगिनींनो, आरक्षणाचा हा लढा अजुन थोडा काळ आपल्याला लढावा लागणार आहे, तो ही सनदशीर मार्गाने. आता आपण आरक्षण लढ्याच्या अंतीम टप्प्याजवळ आलो आहोत. अशा वेळी फार काळजीने हा लढा पुढे न्यावा लागणार आहे. लढा तर चालला पाहिजे पण त्यातुन शासकिय वा खाजगी मालमत्तेच नुकसान होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे .दि. १६ अॉगस्ट २०१८ पासुन जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण सर्व मराठा बंधु भगिनी आपल्या डाव्या दंडावर काळी रिबीन बांधुया. ही रिबीन आपल्याला आपल्या ध्येयाची रोज आठवण ही करुन देत राहील. शिवाय ही रिबीन पाहुन समाजामध्ये मराठा आरक्षणाची चर्चा होत राहील. त्यामुळे काही दिवसाने या लढ्याची तिव्रता कमी होईल व नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं घोंगडं ही भिजत ठेवता येईल या सरकारच्या मानसिकतेला ही चोख उत्तर आपण देऊ शकु. १६ अॉगस्टपासुन प्रत्येक मराठा बंधु भगीनीने आपल्या डाव्या दंडावर दररोज काळी रिबीन बांधण्यास सुरुवात करावी व इतरांना ही बांधण्यास प्रोत्साहित करावे. हे रिबीन बांधणे आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत सुरु राहिल. आपण सुरवात करुया, हळुहळु हे आंदोलन सर्वत्र पसरेल यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करुया.ही रिबीन आपल्याला आपला हक्क व सरकारला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन देत राहील.आरक्षण मिळेपर्यंत डाव्या दंडावर अथवा खिशावर काळी रिबीन लावणे या लोकशाही मार्गाने चालणार्या आंदोलनाची सुरुवात गादेगांव ता. पंढरपूर येथे दि. १६ अॉगस्टपासुन झाली. आपल्या आरक्षणाच्या लढ्यात २६ जणांना बलिदान द्यावे लागले.या बलिदानाचा स्मरण आपल्याला सतत होत रहावे व २६ मावळ्यांना प्राणाची आहुती द्यावी लागेल इतका समाजाचा अंत पाहणार्या शासनाचा निषेध म्हणून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. सर्व समाज बांधवांनी आपल्या खिशावर अथवा डाव्या दंडावर काळी रिबीन बांधुन या सहभागी व्हावे. असे आवाहन संभाजी ब्रिगेड व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने करण्यात आले आहे
