महिला बचत गटाच्या नावाखाली निकृष्ट पोषण आहाराची ‘ठेकेदारी’
डॉ.राजेंद्र भारुड यांच्या कारवाईच्या आदेशाने ठेकेदारांचे धाबे दणाणले
महिला बचत गट सक्षम व्हावेत त्यांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने शासनाने शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचत गटांना संधी देण्याचा निर्णय घेतला मात्र मजूर सहकारी संस्थांप्रमाणे यातही ठेकेदारांनी आपले उखळ पांढरे करुन घेण्याचाच उद्योग आरंभला असून अनेक बचत गटांच्या अध्यक्षांनीच आपल्या बचत गटाची ‘फाईल’ पोषण आहाराच पुरवठा करण्याचा धंदा करणार्यांना देवून चिरीमिरीवर समाधान मानत शासनाच्या चांगल्या हेतूला हरताळ फासल्याचे दिसून येते.मात्र जो पर्यंत या शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत तक्रारी येत नाहीत व काही अघटीत घटना घडत नाही तो पर्यंत संबधीत महिला बचत गट आणि त्याचे सभासद कारवाईच्या कक्षेत येत नसतात मात्र पोषण आहाराबाबत तक्रार आल्यास मात्र बचत गटास कारवाईस सामोरे जावे लागते.अनेक ठिकाणी नाव बचत गटाचे मात्र पोषण आहाराचा मलिदा एकाच्या घशात अशीच परिस्थीती आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शालेय पोषण आहार योजनेतील अपहारप्रकरणी येथील सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापकांसह महिला बचत गटावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्हयातील बचत गटांच्या नावे शालेय पोषण आहाराची ठेकेदारी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन म्हणून प्रामाणिकपणे काम करणार्या महिला बचत गटांना मात्र या कारवाईची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही.
शाळेला पुरविला जाणार्या आहारसंबधी अभिलेख अपूर्ण ठेवणे तसेच किडलेले धान्य वापरणे, भाजीपाला खराब असणे याचबरोबर परिसर अस्वच्छ ठेवणे अशा अनेक गोष्टींकडे लक्ष वेधत ऍड. अविनाश गायकवाड यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. गायकवाड यांच्यासोबत तक्रारदार म्हणून पालक चंदन मनगिरे, विकास कांबळे तसेच ऍड. श्रीनिवास सुरवसे यांचाही समावेश होता. दरम्यान, कमी तांदूळ शिजवून अधिक लाभार्थी दाखवित अनुदान व मानधन घेऊन अपहार केला असल्याची तक्रार या सर्व तक्रारदारांनी केली होती.याची गंभीर दखल घेत डॉ.राजेंद्र भारुड यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
